Tuesday, 28 November 2017

भाग १८ : Eco tourism ची मुहूर्त मेढ - year 2014

त्याने राजीनामा देण्याचा मनसुबा वरिष्ठांना कळविला तरी, एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे आणि ऑफिस मधील वास्तव्यामुळे, त्याला १ वर्षासाठी 'part time' जॉब चा पर्याय कंपनी तर्फे सुचविला गेला. १ वर्षा नंतर त्याला राजीनामा देण्याचा किंवा ऑफिस मध्ये full -time  रुजू होण्याचा मार्ग स्वीकारायचा होता. ह्यात दोन पर्याय होते, एकतर आठवडाभर 'part time' करायचे किंवा Monday -Thursday full-time करायचे आणि Friday ला सुट्टी. म्हणजे आता आठवड्याचे ३ दिवस आजोळसाठी देता येणे शक्य होणार होते !

ह्या दुसऱ्या पर्यायाचे आम्ही आजन्म ऋणी राहू ! कारण आजोळ चे 'Aajol-The Village Homestay' मध्ये, eco-tourism मध्ये रूपांतर होण्यात ह्या पर्यायाचा फार मोलाचा वाटा आहे. नाहीतर  financially सगळे थोडे अवघड होऊन बसले असते. 
पण म्हणतात ना  'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है !' 



तर हे वर्ष म्हणजे eco-tourism साठी पायाभरणीचे वर्ष ठरले. पाहुण्यांसाठी राहण्याची सोय, लहान-थोर सगळ्यांना आवडतो असा झोपाळा आणि see-saw ची सोय, जेवणाचा मेनू ठरविणे इत्यादी गोष्टींकडे आता संपूर्ण लक्ष केंद्रित केले.  
'Aajol-The Village Homestay'  ला महाराष्ट्र tourism मंडळातर्फे (MTDC तर्फे )Bed and Breakfast साठी मंजुरीही मिळावली . 

ह्याच वर्षी चहाचा कप कसा असावा तिथपासून बाहेर 'buffet' लावायचा असल्यास कुठल्या प्रकारची भांडी लागतील ह्या सगळ्या शोध मोहिमेला सुरुवात झाली. जिथे घरातील इन मिन ३ माणसांचा स्वयंपाकही 'मावशींना' मदतीला घेऊन केला जाई तिथे एका वेळी १५ -२० जणांचा स्वयंपाक करण्यास आम्ही सज्ज झालो. आणि पुढे पुढे तर 'sky gazing' च्या event मध्ये चक्क ३०-४० जणांच्या स्वयंपाकाची जबाबदारीही मस्त पैकी पार पाडली. गावामध्ये जिथे घरातील स्त्रिया प्रामुख्याने चुलीशीच जुंपलेल्या असतात किंवा एकत्र कुटुंबामध्ये राहणार्यांना अर्थातच 'छछ्या,  ह्यात काय मोठ्ठ! ' असे वाटणे साहजिक आहे. पण Engineering चा अभ्यास, त्या नंतर करिअर, नोकरी आणि मग  nuclear फॅमिली ह्यातच वयाची ४० शी गाठलेल्यांना अचानक ३०-४० जणांचा स्वयंपाक म्हणजे डोक्यावरून पाणीच! त्यात आणि आपल्याला आपल्या घरच्यांच्या चवी आणि सवयी तोंडपाठ असतात, पण इथे नित्य नवीन पाहुणे आणि त्यांना रुचेल असे जेवण बनवायचे !
तर कधी अंदाज चुकत, तर कधी दारात आल्या आल्याच, "आमच्या बाळासाठी bournvita घालून दूध आणा, माझ्या बहिणीसाठी फक्त गरम दूध,  आमच्या ताई साठी नुसते वरण-भात आधी आणा, मोठ्यांसाठी व्हेज जेवण लावायला घ्या आणि नॉन -व्हेज जेवण मात्र थोडे नंतरच लावा " अशा एका वेळी १० सूचना देणाऱ्या आणि आजोळ ला 'hotel' समजणाऱ्या पाहुण्यांना शांतपणे हाताळायला आम्ही शिकत होतो. 

पाहुण्यांच्या सरबराई बरोबरच निसर्गाशी निगडित आणि निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करता येतील असे 'workshops'  घ्यायचे आम्ही ठरवले.  
'Aajol-The Village Homestay' मधल्या पहिल्या workshop चा मान जातो तुषार केळकर ने conduct  केलेल्या 'The Art of Nature' ह्या workshop ला. 





ह्या workshop च्या यशा मुळे आता आम्हाला नवीन हुरूप येत होता आणि आपण जे करतोय ते योग्य आहे अशी खात्री वाटू लागली होती .  

क्रमशः 


   

Sunday, 26 November 2017

भाग - १७ आणि तो क्षण आला : year 2014

नोकरीच्या सुरुवातीच्या काळात किंवा फारशी जबाबदारी नसलेल्या bachelor life मध्ये नोकरीला राजीनामा देऊन स्वतःचे business चालू करणे तुलनेने सोप्पे असते.  हां, आता त्यावेळीही चाकोरी बाहेरचा विचार करणे तेवढेच अवघड असते जेवढे ते आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असते. परंतु एकाच क्षेत्रात खूप जास्त experience असणाऱ्यांना त्या क्षेत्रात 'job' चे पर्याय मर्यादित होत जातात.नोकरी नामक पिरॅमिड च्या टोकावर पदांची संख्या कमी आणि पर्यायी माणसे जास्त असेच काहीसे चित्र असते त्यामुळे जस जसे वय वाढते तस तसे 'लाथ मारेन तिथे नोकरी ' म्हणण्याचे प्रमाण कमी होत जाते.

 तर सांगायचं मुद्दा असा की ज्या वेळी मी पूर्ण वेळेची नोकरी सोडून कधी पार्ट टाईम, कधी 'work from home' किंवा कधी पूर्ण वेळ 'home maker असे वेगवेगळॆ पर्याय त्या त्या वेळी गरज म्हणून करीत होते. त्या वेळी त्यानेही पूर्ण वेळेची नोकरी 'आजोळच्या' भरवशावर सोडून देणे म्हणजे अंधारात सर्कशीतल्या उंच झुल्यावरून स्वतःला सोडून देण्यासारखे होते.
 कर्त्या पुरुषाने सुस्थितीतला जॉब सोडायचा !!
ज्या नोकरी मध्ये त्याने आयुष्याची तब्बल ११ वर्षे घालवली (IT  क्षेत्राच्या 'ह्या ऑफिस मधून त्या ऑफिस मध्ये' उड्या मारण्याच्या वहिवाटे नुसार एकाच ऑफिस मध्ये एवढी वर्षे खूप जास्त आहेत.) त्या ऑफिसला आणि एकंदरीत नोकरीला राम राम करणे तेवढे सोप्पे नाही. पण पैसा, नोकरी मधली सुरक्षितता आणि शाश्वतता ह्याचा जितका जास्त विचार आम्ही करीत राहिलो असतो तितका हा निर्णय घेणे कठीण होऊन बसले असते.   
आम्ही  ही 'leap of faith घायचे ठरवले. आणि हो नाही करीत तो दिवस आला. त्याने ऑफिस मध्ये त्याच्या 'डिलिव्हरी हेड' ला 'आजोळ' व पूर्ण वेळेची नोकरी ह्या दोन दगडांवर पाय ठेवून जाणे जमत नसल्यामुळे आपण राजीनामा द्यायच्या विचारात आहोत हे कळविले.  

क्रमशः 

Thursday, 23 November 2017

भाग - १६ To be or not to be : Year 2014

 मातीशी मैत्री करण्याबरोबरच, eco-tourism मध्ये जम बसविण्यास हळूहळू आम्ही सुरूवात केली. पण office सांभाळून वीकेंड्सना booking manage करणे, कायम स्वरूपी care taker च्या गैरहजेरीत rooms maintain  ठेवणे, guests साठी भोजनाची सोय करणे आणि एकीकडे घराची आघाडी सांभाळणे हे सगळे stressful व्हायला लागले. हे म्हणजे असे झाले की ज्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी हे सगळे सुरु केले, ते आयुष्य आता पुन्हा नव्याने आणखीनच धकाधकीचे करून ठेवले. 

दोघांपैकी एकाला पूर्णवेळ 'आजोळ'ची जबाबदारी स्वीकारणे आता भाग होते. मुलीची शाळा सोडून आणि इतर व्यवधाने सोडून कायम स्वरूपी आजोळला राहण्यासारखी परिस्थिती तेंव्हा न्हवती. आजही आजूबाजूच्या गावतील वातावरण वैचारिक दृष्ट्या मागासलेले आणि काही अत्यंत बेसिक सोयी सुविधांचा अभाव असणारे असेच आहे आणि 'आजोळ' घडविण्यामागे एक स्वयंपूर्ण, सृष्टीसौन्दर्याने नटलेले 'food forest' बनवणे हाच एक उद्देश आहे. गावात वैचारिक क्रांती घडवून आणणे किंवा गावाचा विकास करणे असे महान कार्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे असा कुठलाही अभिनिवेश आम्ही बाळगत नाही. म्हणूनच गावी जाऊन राहणे आणि आहे त्या सामाजिक परिस्थित राहून बदल घडवून आणणे ही आमची सध्या तरी priority नाही. पण शहरीकरणामुळे जे एक धकाधकीचे आणि अनेक व्यवधाने असल्यामुळे थोडेसे complicated झालेले जीवन आपण जगतोय आणि आणि इतर असंख्य जीव जगत आहेत;  ह्यातून चार घटका तरी बाहेर पडता यावे, 'TV', 'Internet' मुळे always connected असलेले आयुष्य थोडा वेळ 'disconnect' करता यावे आणि 'resort' ऐवजी गावातील साधेच परंतु आनंददायी जीवन, शुद्ध हवा, चविष्ट घरगुती भोजन आणि निसर्ग ह्यांच्या सहवासात माणसाला 'स्वतःशी connect' करता यावे. हा एकमेव उदयेश 'आजोळ' च्या eco -tourism मागे आहे. 

तर असो,  माणसाच्या काही मर्यादा असतात, तो एका वेळी काही मोजक्याच आघाडींवर पूर्ण लक्ष देऊ शकतो आणि त्या मर्यादा ज्याच्या त्याने ओळखून वागले तरच भ्रमनिरास होत नाही. त्या प्रमाणे काही व्यावहारिक कारणांमुळे मला 'आजोळ' ला राहून operations सांभाळणे शक्य नाही हे स्पष्ट होते आणि त्यालाही नोकरी सांभाळून ते करता आले नसते. मग करावे तरी काय?  'नोकरीला राजीनामा द्यावा का ?' 'इतक्या लवकर नोकरी सोडण्याचे पाऊल उचलावे का?' 'आजोळच्या संगोपनाच्या दिवसांतच कोणा care taker जोडप्यावर सोपवून देणे म्हणजे इतर अनेक व्यावसायिक 'रिसॉर्ट' प्रमाणेच झाले असते आणि शक्य होईल तेवढे 'commercialism'  टाळण्याचे आम्ही प्रयत्न करीत होतो .'To be or not to be?' अशा प्रश्नांपर्यंत येऊन 
आता आमची गाडी रेंगाळली . 

क्रमशः:

Saturday, 18 November 2017

भाग १५- अवलिया : तुषार केळकर

'यूं ही चला चल राही, कितनी हसीन है ये दुनिया
 भूल सारे झमेले, देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया
ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे..'
'Atmatrupti' (आत्मतृप्ती') च्या वाटेवर प्रवास करणाऱ्या 'उद्धर'च्या Tushar Kelkar ला असेच काहीसे वाटत असेल का, जेव्हा त्याने त्याचा हा प्रवास सुरु केला ?!

तुषार केळकर,  रायगड जिल्ह्यातील 'उध्दर' गावी लहानाचा मोठा झालेला,  mechanical डिप्लोमा केलेला तुमच्या आमच्या सारखाच एक तरुण; आजुबाजुची तरुणाई शहराकडे नोकरीसाठी वळत असताना, 
हा मात्र  नोकरीची कांस न धरता, 'सेंद्रिय (organic ) शेती आणि निसर्गाला पूरक असे मातीचे, बांबूचे बांधकाम थोडक्यात Eco -Architect म्ह्णून गावातच आपले बस्तान बसवू पाहतोय. आपल्या जीवनातूनच तो गावातील तरुणांपुढे एक आदर्श उभारू पाहतोय की 'शहरातील हॉटेल मधली चाकरी करण्यापेक्षा, दहा बाय दहा च्या भाड्याच्या खोलीत राहण्यापेक्षा, गावात स्वतःच्या घरी राहून, आजवर दुर्लक्षिलेल्या शेतीला नवजीवन देऊन गावामध्येच उपजीविकेचे साधन निर्माण करता येईल का. '     
आपल्या सारख्याच परिस्थितींतून गेलेली ही माणसे त्यांचे आयुष्य अशा काही मनस्वीपणे जगत असतात कि आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटत असतानाच कुतुहुलही वाटून जाते की 'असे मनस्वी आयुष्य जगण्याचा आपण विचार जरी केला तरी जी असुरक्षिततेची भावना आपल्या मनात जागी होती, त्या भीतीवर ही माणसे कशी मात करतात ? आर्थिक सुबत्ता, त्या सोबतच येणारे स्थैर्य, ऐषोआराम ह्या सर्वांचे विचार आपल्याला ज्या मोहात अडकवतात आणि एकसुरी आयुष्य जगण्यास भाग पडतात, ते मोह ह्या मनस्वी लोकांना पडतच नाहीत का? की त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी असते ?'



शालेय वयातच त्याच्याच एका चुलतभावामुळे मिळालेलं सर्प ज्ञान, त्यातून निर्माण झालेली निसर्गाबद्दलची आस्था तुषारला जंगल प्रेमी आणि एकंदरीत निसर्ग प्रेमी बनवत गेली. सर्प मित्र असलेल्या तुषारला कधी-कधी एकटेच जंगलात जाऊन राहायला आवडते.  लोहगड आणि परिसरातील सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये तो एकटाच रात्र रात्र राहूनही आलाय. राजस्थान, हिमांचल येथे जाऊन कॅम्पिंग करायला त्याला आवडते. 




तुषारच्या बाबतीत योगायोगानेच गोष्टी घडत गेल्या. तो मुंबईत icici बँकेत interview द्यायला आला होता आणि सिलेक्टही झाला होता.  बँकेत रुजू व्हायला ३ दिवस होते, त्या ३ दिवसात 'आनंद पेंढारकर' ह्या मित्राकडून पालघर मधील एका organic farm getaway वर  group coordination, group games organize करणारे कोणीतरी हवे होते असे कळले. निसर्गाच्या सहवासात राहून काम करण्याची संधी स्वतःहून चालून आली म्हटल्यावर तुषारने मग सरळ  icici बँकेत जाण्या ऐवजी पालघरचा रस्ता धरला. तेथील एका वर्षात तो बऱ्याच गोष्टी शिकला आणि इथेच तो 'Swaraj University' च्या रेवा दांडगे आणि मनीष जैन ह्यांना भेटला. रेवा दांडगे ह्यांचं कडून 'तपोवन आश्रम' उदयपूर येथील Swaraj University च्या 'खोजी' बद्दल त्याला माहिती मिळाली.  (Swaraj University is based on the philosophy of self-designed learning and green entrepreneurship  - src: इंटरनेट ). पालघर मध्ये एक वर्ष काढल्यावर मग त्याने Swaraj University मध्ये २ वर्षे राहून earth building, bamboo construction ह्या त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावर 'खोजीगिरी' केली.  उदयपूर कॅम्पस मध्येच पहिले 'bamboo hut' बनवून आपल्या creativity ला वाट मोकळी करून दिली. 



स्वराज मधून बाहेर पडल्यानंतर तुषार सध्या त्याच्या मूळगावी उद्धरला त्याच्या शेतावर 'Atmatrupti' नावाचे 'Open Community space' विकसित करण्यात गढून गेलाय.  शहरी लोकांना AC शिवाय, कोणत्याही luxury शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या आभाळाखाली 'कारवी' आणि बांबूच्या झोपडीत राहण्याचा आणि शेतावर काम करण्याचा विलक्षण अनुभव देण्याचे काम तो इथे करतोय.  त्याच्या ह्या Atmatrupti मध्ये 'helpx' 'workaway' सारख्या वेबसाईट च्या माध्यमातून बरीच युरोपियन, अमेरिकन मंडळी राहून आणि त्याच्या बरोबरीने कामे करून गेली आहेत. त्याला जगाची माहिती मिळवायला जगभर फिरावे लागत नाहीत, ही मंडळीच त्याच्या सोबत जगभरचे अनुभव 'share' करायला येतात . 

 'Atmatrupti' बरोबरीनेच terrace top farming, इको-construction( Adobe building, Earth bag construction, rammed earth, bamboo constructions) , geo-dome, organic farming अशा विविध कार्यशाळा घेत तुषार भारतभर ( पुणे, नवी-मुंबई, बंगलोर, राजस्थान)  फिरत असतो.  

पूर्वी तो ह्या अनवट वाटेवर एकटाच होता, परंतु आता त्याला, त्याचे कार्य समजून घेणारी व  त्यात तितक्याच उत्साहात सहभागी होणारी साजेशी जोडीदार 'Aakanksha'  च्या रूपाने मिळाली आहे. 

Saturday, 11 November 2017

भाग -१४ अवलियांची दुनिया

Eco-tourism चालू करायला अजून अवकाश होता. 
हिरवाई ने नटायला माळरानाने आत्ता कुठे सुरुवात केली होती. पाहुण्यांचे स्वागत करायला अजून तो तयार न्हवता.  त्या मुळे आम्ही आमचा मोर्चा, 'गावी स्थलांतरित झालेले किंवा तिथे राहणारे अवलिया' ह्या विषयावरील संशोधनाकडे वळविला . 

"Life is what you make it, FIND YOUR OWN " किंवा 
"Change your thoughts and you change your world " ह्या आणि अशांसारखे आपण आतापर्यंत फक्त पुस्तक, सिनेमां मधून अनुभवलेले, रोमांचकारी, अद्भुत आणि परिश्रमाने भरलेले आयुष्य ज्यांनी वास्तवात आणले अशा अवलियांची दुनिया आम्ही याची डोळा पाहून यायचे ठरवले. 

पोपटराव पवार
एका जुन्या मराठी सिरीयल मधून (मला वाटते soKool हि सोनाली कुलकर्णीची सिरीयल होती) ज्यांच्या बद्दल ऐकले होते ते नगर जिल्ह्यातील 'हिवरे बाजार' चे ख्यातकीर्त सरपंच पोपटराव पवार. ज्यांनी पाणी आणि मातीचे संवर्धन करून आणि गावच्या एकत्री करणातून दुष्काळी 'हिवरे बाजार' चा सुंदर कायापालट केलेला आहे. 
आमच्या शहरी मनाला अतिशय आशचर्य जनक अशी कुठली बाब वाटली असेल तर त्या गावात आम्ही गेलो तेंव्हा एकही दुकान (रेशनिंग दुकान वगळता) किंवा हॉटेल किंवा पान टपरी न्हवती.कारण हेच कि मुलांना/तरुणांना वेफर्स, स्नॅक्स, पान, बिडी अशा कुठल्याही गोष्टींची सवय लागू नये. गावातले रस्तेही आपण त्यावर आरामात झोपू शकू इतके स्वच्छ होते. काही वर्षांपूर्वी हेच गाव गरिबीत आणि व्यसनाधीनतेमध्ये आकंठ बुडाले होते हे आता कोणी सांगितले तर विश्वासच बसू शकत नाही. 

source: Internet

 'वॉटर बँक' आणि 'सर्व सहमतातून त्या त्या वर्षी काढण्यात येणारे पीक' ह्या दोन गोष्टींचा वापर, अतिशय कमी पाण्यात येणारेच पीक घ्यायचे  समस्त गावकऱ्यांना केलेले compulsion वजा आवाहन; उगीच ते गाव संपूर्ण महाराष्ट्रात 'Model Village' म्हणून प्रसिद्ध नाही!  आम्ही गेलो तेंव्हाही तिथे buses भरून दूरदूरच्या गावातील रहिवासी /ग्रामपंचायत अधिकारी भेट द्यायला आले होते. जरी आम्ही दोघेच तिथे गेलो होतो तरीही तेथील एका तज्ज्ञ व्यक्तीने आम्हाला पार डोंगरावर नेवून watershed मधला 'ridge to valley approach' समजावून सांगितला. खोटे का बोला, पण त्यांनी त्यावेळी सांगितलेले 'contour trenches, gully plugging,loose boulder structure, gabian structure अशांसारखे शब्द आम्हाला alien वाटत होते ! पण त्या नंतर लगेच २ वर्षात मी स्वत: watershed management शिकणार आहे हे स्वप्नातही न्हवते. आणि आता त्या सगळ्याचा अर्थ व्यवस्थित समजतोय. ('Connecting dots ' म्हणतात ते हे असे ! )  

source: Internet
source: Internet

अमृते
१९७७ साली शहरातून दापोली तालुक्यातील 'गव्हे' ह्या गावी स्थायिक झालेले 'निसर्ग सहवासाचे' अमृते  कुटुंब हे ह्या अवलियां पैकीच; मी, आई कडून त्यांच्या बद्दल खूप ऐकले होते की त्यांनी खिशात मोजकेच पैसे असताना शहरातून 'गव्हे' गावी  स्थलांतर केले. पुढे टप्या टप्याने पूर्ण डोंगराचा त्यांनी कायापालट केला वगैरे. गावी राहण्याचा आणि शेतीचा काहीच अनुभव त्यांच्याही गाठीशी न्हवता आणि त्यामुळेच त्यांचे काम प्रत्यक्ष पाहणे आमच्या साठी गरजेचे आणि स्फुर्तीदायक होते. त्यांचे  'निसर्ग सहवास' eco -tourism चे एक उत्कृष्ट  
रोल मॉडेल आहे. त्यांचा मुलगा आशिष अमृते हा त्या  eco -tourism चा शिल्पकार ! खरेच, एक पिढी शहरातून गावी स्थालांतर करण्याचा धाडशी निर्णय घेते काय आणि त्यांची पुढली पिढी त्या धाडसाला एव्हढ्या सुंदर वळणावर आणून सोडते काय, सगळेच रोमॅंटिक! 

वेंकट
असाच एक अवलिया म्हणजे 'वेंकट सर', एका google ग्रुप मुळे त्यांच्या बद्दल आम्हाला कळले. 
तेही corporate lifestyle ला कंटाळून, शहरी जीवनाला कायमचा राम राम ठोकून पूर्ण वेळ निसर्गाचे, शेतीचे 
scientific संशोधन करण्याकडे वळले होते. आजही ते पालघर तालुक्यात त्यांच्या शेतावर राहतात. भात, वाल, हळद,  मटकी, ऑइल सीड्स, वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या फार्म वरतीच पिकवून 'Self-sufficient living' ची त्यांची वाटचाल सुरु आहे. 

केतन शाह
कर्जतचे केतन शाह,  हे ही एक मुंबईत राहून, कर्जतला ये जा करणारे व भाजीचा मळा फुलविणारे आधुनिक शेतकरी. शिक्षणाने ते CA  असले तरी आता ते पूर्णवेळ ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स च्या retailing चा व्यवसाय करतात. त्यांनी  केळी, अननस, पपई , शेवगा, दुधी भोपळा, कांदे आणि इतर भाज्या पिकवण्यात किती मेहनत घेतली आहे ते त्यांचा रहदारीच्या दृष्टीने अवघड आणि काहीसे कर्जत शहरापासून बरेच आड वळणावर असलेले शेत पाहूनच येते. 
   
स्वर्गीय भास्कर सावे (मृत्यू : २०१५)
गुजरात -महाराष्ट्र बॉर्डर वरील, उमरगाव मध्ये राहणारे , 'Gandhi of natural farming' म्हणून ओळखले जाणारे ऋषितुल्य भास्करजी सावे. YouTube वरील natural फार्मिंग वरील videos बघताना कळेल कि 'one straw revolution' घडवून आणणारा Masanobu Fukuoka नावाचा  japanese अवलिया १९७७ साली  भास्कर सावेंच्या फार्मला भेट देऊन गेला. 'कल्पवृक्ष' हे त्यांच्या 'food forest' चे नाव. संपूर्ण देशभरातून agricultural scientists, शेतकरी, विद्यार्थी त्यांच्या कडील ज्ञानामृताचे प्राशन करण्यासाठी आणि त्यांच्या नारळ व चिकूनी डवरलेल्या वाडीला भेट द्यायला येतात . ५० वर्षांचे, १० एकरावरील त्यांचे हे शेत, २ एकरांवरील नारळाची 'नर्सरी' आणि ३ एकरांवरील भात शेती त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी परिपूर्ण आहे. कुठल्याही बाह्य 'inputs' ची गरज त्यांना लागत नाही.  आमच्या 'फॅमिली' friendच्या ओळखी मुळे अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला जवळून भेटण्याचा योग जुळून आला. 'वापसा', 'mulching', 'निसर्गाचे सहजीवन' आणि विषमुक्त नैसर्गिक शेती ह्यांचे महत्व त्यांच्या मुलाने आम्हाला समजावून सांगितले. भास्करजी सावे आता वयोमानामुळे थोडे थकले होते, ते आता फारसे कोणाशी बोलत नसत . (पुढच्याच वर्षी त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि आम्ही किती नशीबवान आहोत कि आम्हाला त्यानां प्रत्यक्ष भेटता आले, असा विचार मनात डोकावून गेला.)
        






क्रमशः 

Thursday, 9 November 2017

भाग १३ - मातीशी मैत्री

"You can't connect the dots looking forward; you can only connect them looking backward. So you have to trust that the dots will somehow connect in your future. You have to trust in something--your gut, destiny, life, karma, whatever. This approach has never let me down, and it has made all the difference in my life." --Steve Jobs

खरंय, आम्हाला तरी कुठे माहित होते, की आम्ही ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग आम्हाला ईप्सित स्थळी नेवून सोडेल, की आमचे  वारू भरकटेल?  पण पहिली अडखळती पाऊले टाकल्याशिवाय ते कळणार तरी कसे ?
आम्हाला आता ३ पातळ्यांवर काम बघावे लागत होते.  
जमिनीचा barren land ते Multi Story agroforestry पर्यंतचा प्रवास, eco-tourism आणि गावी स्थलांतराचे पर्याय.गमतीचा भाग असा की ह्या तीनही पातळीवर आम्ही अजून बालवाडीतच होतो. 

Multi Story agroforestry  चे पहिले पाऊल म्हणून विंड ब्रेकींग साठी कदंब, बहावा,ऑस्ट्रेलियन साग, गुलमोहोर, त्या नंतर मुख्य जमिनीवर आंबा, फणस, जांभूळ इ. मोठी झाडे आणि सीताफळ, जांब, काजू, रामफळ, पेरू इ. मध्यम झाडे  अशांची निवड आणि लागवड केली. 
जमिनीचा एक भाग खूपच उताराचा होता, मग त्या पट्ट्यात अननसाची लागवड केली. अननस खायला मिळेल कि नाही ते माहित न्हवते पण, उताराच्या जमिनीवर मातीची धूप थांबविण्यासाठी तो एक उत्तम पर्याय होता. 



आम्हाला वारंवार आजोळला जाणे शक्य न्हवते तसेच कित्यकेदा अतिशय कडक ऊन आणि बियांकडे झालेले दुर्लक्ष ह्या मुळे आम्ही आजोळला प्रत्यक्ष मातीत लावलेलं बी अंकुरत नसे किंवा रोपं फार छोटी असतानाच जळून जात. तिथेच कायम स्वरूपी राहून झाडांची काळजी घेणारे कोणी आम्हाला मिळत न्हवते. मिळाले तरी ३ महिन्यात पोबारा. ह्या २-३ वर्षात कातकरी, ठाकूर,नेपाळी अशा कोणा कोणाच्या हातापाया पडाव्या लागल्या, कोणा -कोणाच्या अगदी घरी जाऊन मनधरणी करावी लागली ह्याला ददात नाही. 'कोण म्हणतो बेकारी आहे !!'  

मग ह्या वर उपाय म्हणून शहरातील घरालाच seedling लॅब बनवले. वेगवेगळ्या भाज्यांचे बी पेरून बघणे; मातीत, कमी मातीत (coir , व्हर्मी-कंपोस्ट आणि थोडी माती) आणि विना -मातीत (ओलसर कापूस)  बियाणे लावून कुठले बी आधी अंकुरते आणि आजोळाला प्रत्यक्ष जमिनीत लावणे सोयीचे जाते ह्याचा अभ्यास सुरु झाला. जुन्या प्लास्टिक च्या बाटल्या, छोटे प्लास्टिक कप्स, प्लास्टिक कॅन्स,  seedling trays  ह्या मध्ये रोपे तयात करण्यात आली.शहरात घरी अंकुरलेली भोपळा, भेंडी, फ्लॉवर , कोबी , वांगी, टोमॅटो, तूर,   मिरच्या इत्यादींची रोपे जेंव्हा आजोळच्या मातीत बहरू लागली तेंव्हा आनंदाला पारावार उरला नाही.   








ह्या सर्वात मुलेही, मातीत  खेळण्याचा, मोकळया आभाळाखाली विटांची चूल बनविण्याचा आणि त्या चुलीवर शिजवलेली साधीच डाळ-तांदळाची खिचडी,  झाडाखाली बसून खाण्याचा आनंद अनुभवत होते.फक्त शहरात राहून आणि weekends ला मॉल्स भटकून किंवा movies  बघून, अशा साध्या गोष्टीतही आनंद मिळतो हे त्यांना कसे कळले असते. मातीत खेळून हात खराब होत नाही तर मन प्रसन्न होते हे ही नसते अनुभवता आले.   
  



क्रमशः 

Saturday, 4 November 2017

भाग -१२ 'माळरानाचे ' चे बारसे


कधी कधी आपल्याला काही गोष्टी सहज घडताना दिसतात किंवा कधी वाटते की काही माणसांचे नशीबच चांगले त्यांना गोष्टी आयत्या आणि सहज मिळून जातात वगैरे वगैरे, पण त्या गोष्टी घडण्या मागे वर्षानो वर्षाची पार्श्वभूमी असू शकते, अर्थात नशिबाचीही साथ असतेच म्हणा (१% त्याचा महत्वाचा असतो, बाकी ९९% तर तुमचेच असतात ) . तर आमच्याहि बाबतीत काहीसे असेच घडले.

जमीन जरी त्याने पप्पांच्या सांगण्यावरून १४ वर्षांपूर्वीच घेऊन ठेवली होती, तरी ती केवळ पुढे मागे विकता येईल ह्या उद्देशानेच. तेंव्हा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल कि आपण तेथे सुंदर eco-tourism विकसित करणार आहोत.
Eco-tourism ह्या कल्पनेचे श्रेय अप्रत्यक्षरित्या आईला जाते. लग्नापूर्वी आम्ही भावंडे आई-बाबांबरोबर हिवाळी सुट्टीत किंवा पावसाळ्यात(ऑगस्ट - सप्टेंबर) नेहमी कोकण वाऱ्या करायचो आणि त्यातून कोकणातील सृष्टी सौंदर्याचे आणि तिथल्या चविष्ट खाद्य संस्कृतीचे आम्ही अट्टल भक्त बनलो होतो. मालवणी जेवण बनविण्यात आईचा हातखंडा असल्यामुळे ती नेहमी म्हणायची की आपलेही एक मालवणी खाद्य संस्कृतीचे हॉटेल असले पाहिजे जे खवय्यांना तृप्त करेल. मला वाटते ती इच्छा सुप्तपणे माझ्याही मनात वास करून राहिली. मालवणी खाद्य संस्कृतीचे हॉटेल काढले पाहिजे असे मलाही नेहमी वाटायचे. 

पुढे शिक्षणाने मी इंजिनीर झाले आणि सॉफ्टवेअर मध्ये स्वतःचे बस्तान बसवले तरी मनातून मी ITian न्हवते. ८ वर्षांच्या IT अनुभवानंतर मात्र, घर आणि पूर्ण वेळेची नोकरी ह्यांच्या तारेवरच्या कसरतीला मी कायमचा राम-राम ठोकला आणि आवडीच्या वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या. 
त्यातूनच जन्म झाला 'soupsnsalads _____ the health lounge' ह्या फेसबुक वरील माझ्या पेजचा,जे मी घरी केलेल्या 'Healthy recipes' ना dedicated आहे.  आमच्याच उपनगरातील एका S.S.C. बोर्डाच्या English medium च्या शाळेतही मी अर्ध-वेळ (part-time) IT teacher (इयत्ता ५-१० वी ) म्हणून ३ वर्षे काम केले. 
पुढे माझ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करता यावा आणि माळरानी नंदनवन फुलविण्या बरोबरच त्याची आर्थिक आघाडी सांभाळता यावी म्हणून खूप विचार-विनिमयातून  'eco-tourism' हा पर्याय आम्ही निवडला. त्याची संकल्पना अशी होती की , इथे आलेल्या पाहुण्यांना खुल्याआसमंती मोकळा श्वास घेता येईल आणि इथले नोरम सृष्टी सौंदर्य न्याहाळण्या बरोबरच घरच्या कोकणी पद्धतीच्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेता येईल . ह्यातूनच मग आमच्या  'eco-tourism' मधल्या experiments ना सुरुवात झाली. experiments ह्या साठी म्हटले कि आम्हा दोघांनाही tourism व्यवसायाचा किंबहुना एकूणच व्यवसायाचा शून्य अनुभव होता. पण comfort zone मधून बाहेर पडल्या शिवाय का प्रगती होते?

आता 'eco-tourism' म्हटले की, माळरानाला एक छान नाव पाहिजे; उन्हाळ्यातही नयन सुख देणारे म्हणून 'गुलमोहोरं ' हे नाव द्यायचे ठरले, पण मग ठरेल कि अगदी स्वतःच्या घरी घेतली जाते तशी काळजी घेणारे  आणि पाहुण्यांना कोकणातल्या 'आपल्या आजोळची' आठवण करून देणारे असे हे घर म्हणून 'आजोळ' हेच नाव त्याला चपखल बसेल.  
आणि सरते शेवटी, ६ जानेवारी २०१३ च्या शुभं मुहूर्ती, सत्यनारायणाच्या साक्षीने आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आमच्या माळरानाचे 'आजोळ' असे नामकरण झाले.     







क्रमशः

Wednesday, 1 November 2017

भाग -११ शेतीची बाराखडी आणि landscaping ची ABCD

संपूर्ण मे ते सप्टेंबर गोष्टी फार वेगाने घडत होत्या. 


हो-नाही करत करत, इंद्रायणी जातीचा (local variety) तांदूळ, खालच्या भात-खाचरांमध्ये घायचे ठरले. घरातल्या सगळ्यांनी गुढघ्याभर चिखलात माखून भात-लावणी अनुभवली. त्याने नांगराणीचाही अनुभव घेतला. पुढे ह्या तांदळाचा भातासाठी नाही पण भाकरी साठी खूप छान उपयोग झाला. आम्हालाही घरच्या तांदुळाची भाकरी कशी असते ते चाखायला मिळाले. मात्र तो पहिला आणि शेवटचा अनुभव होता. 
गडी माणसांची उपलब्धता, बैलजोडी आणि नांगरणीचा खर्च आणि त्या बदल्यात असणारे एवढुसे भात-खाचर ह्याचा ताळमेळ न बसल्यामुळे पुढील वर्षांपासून आम्ही भात पिकविण्याचा नाद सोडून दिला. जेव्हा स्वतः पुरता भात काढायचा असतो तेंव्हा, स्वतःची बैल जोडी, रोजंदारी वरच्या गडयां ऐवजी स्वतःचे अख्खे कुटुंब राबणारे असेल तर आणि तरच ते फायदेशीर असते नाहीतर बाहेरून तांदुळ विकत घेणेच परवडते.
पण सगळ्याच गोष्टी पैश्यात मोजाता येत नाहीत, अनुभवाला मोल नसते. 
शहरात हयात घालवून अन्न निर्मितीचा आनंद कसे बरे घेता आला असता.
 You feel more connected to your food when you have spent some time growing it.
भविष्यात पुन्हा भात शेती करण्याचा मनसुबा अजूनही आहे. 



भात शेती बरोबरच, वांगे, मिरच्या, भेंडी, काकडी,चवळी, दुधी ह्यांचीही थोड्या प्रमाणात लागवड करून बघितली. मे महिन्यातच, आम्ही माती, परीक्षणासाठी अलिबागला पाठवून दिली होती, उद्देश हाच की त्यामध्ये कुठले पीक घेता येईल,पण आजतागायत आम्हाला काही त्याचे अनुमान मिळालेले नाही. 
उलट गेल्या ५ वर्षातील चुकांमधून आणि अनुभवातून आम्हाला आता कळलंय की इथे काय चांगले पिकते आणि काय नाही.

अजून एका सुंदर कामात आम्ही बुडून गेलो होतो. 
इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारचे pathways, pergolas, arches आणि रॉक गार्डन्स बद्दल माहिती मिळवायची आणि आपल्याला काय करता येईल त्याचे नियोजन करायचे. 



एक  weekend तर असा होता की आमच्या दोघांमध्ये nursery त जावून झाडे निवडून ती tempo द्वारे आणण्याचे त्राणच शिल्लक नव्हते. तरीही काही practical बाबींमुळे एक न्हवे तर पार तळेगाव, रावेत ह्या ठिकाणच्या 3-4 nurseries मधून झाडे आणावी लागली. 
एका रविवारी 50 बोगनवेल स्वतःच सगळे खड्डे करून लावाव्या लागल्या. 




आजही तो अनुपम सौंदर्याने नटलेला pathway आणि कुंपणावर विराजमान रंगीबेरंगी बोगनवेली बघितल्या की केलेल्या श्रमाचे चिज झाल्यासारखे वाटते.


क्रमशः